मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

दैत्यनिवारणी

दैत्यनिवारणी
     
     " श्वेतु, उठतेस ना? येणार ना दैत्यनिवारणीला?"  😊
नवरात्रातले नऊ दहा दिवस ब्रह्म मुहूर्तावरच आईच्या अशा गोड हाकेनी आमच्या दिवसाची सुरुवात होत असे. कऱ्हाडला शारदीय नवरात्रात दैत्यनिवारणी देवीच्या दर्शनाला जायची प्रथा आहे. एरवी सुट्ट्यांमध्ये दिवस उजाडेपर्यंत अंथरुणात लोळणारी आम्ही मुलं नवरात्रात मात्र पहाटे लवकरात लवकर उठून आवरून तयार होण्याची आमच्यात चढाओढच लागे. कॉलनीतल्या सर्व मायलेकी, सासवा सूना पहाटे सव्वाचार साडेचार पर्यंत आवरून, नटून थटून एकत्र मिळून देवीच्या दर्शनाला जायला निघत असू.
      इतरवेळी एवढ्या भल्या पहाटे बाहेर पडायचे म्हणजे कॉलनीतल्या भटक्या कुत्र्यांची आम्हाला फार भीती वाटायची पण ह्या दिवसात ती सुद्धा न भुंकता आमची अगदी देवळापर्यंत सोबत करायची. नदी कडून येणाऱ्या गार वाऱ्याने शरदातल्या थंडीची चाहूल लागायची. जसजसे देऊळ जवळ येई तसतसे देवळात लावलेली सुरेल गोड आवाजातली भक्तिगीतं अगदी अर्ध्या एक किलोमीटर लांब पासूनच ऐकू येऊ लागायची.  अत्यंत उत्साही, आनंदी  वातावरणात आणि गप्पांच्या नादात आम्ही कोयनेच्या जुन्या पूलाजवळ देवीच्या देवळाजवळ पोहचत असू.  त्या सबंध रस्त्या पासूनच मंदिरा पर्यंत रंगीबिरंगी दिव्यांची विद्युत रोषणाई केलेली असे. झेंडूची पिवळी, केशरी ताजीताजी टपोरी फुलं, हार, जाईजुई मोगऱ्याचे सुवासिक गजरे आणि पूजेचं सामान टोपलीत विक्रीसाठी घेऊन रस्त्याकडेला उत्साहाने बसलेली बायका मूलं दिसत असत. मंदिराला लागून असलेल्या पटांगणातही निरनिराळी मातीची खेळणी, वस्तू घेऊन लोक विकायला बसलेले दिसायचे. त्याच आवारात कधीतरी छोटे स्टेज उभे केलेले असत. त्यावर प्रजापिता ब्राह्मकुमारीच्या साध्वी ध्यान लावून स्तब्ध बसलेल्या असत. त्यांना बिलकुल हलचाल न करता बसलेल्या बघून आम्हाला फार अप्रूप वाटायचं. मग आम्ही मुलं थोडा वेळ तिथेच रेंगाळून त्या कधीतरी हलतील ह्याची वाट बघायचो. कोणा मोठ्यांची हाक आली की मग पुन्हा त्यांच्या मागे धावत जाऊन त्यांना गाठायचो. 
     कधीकधी त्या नऊ दिवसात त्या स्टेजवर मुली देवीच्या नऊ अवतारांची रूपं धारण करून देखावे किंवा छोट्या नाटुकल्या सादर करायच्या. कोणी दूर्गा बनायची तर कोणी महिषासूर. पहायला खूप छान वाटायचे.
    मनात वाटत असे ,एवढ्या लवकर निघालोय आपण, आपलाच पहिला नंबर लागणार दर्शनाला. पण देवळाजवळ पोहचल्यावर मात्र हीsss भलीमोठी रांग दिसत असे. बायकांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी अशा दोन रांगा केलेल्या असायच्या. मंदिराचे कार्यकर्ते दर्शनाचे सगळे नियोजन करायचे. आळीपाळीने महिलांना आणि पुरुषांना मंदिरात प्रवेश द्यायचे काम ते करायचे. रांगेत एकदीड तास उभे राहिल्यावर शेवटी दर्शनाला आमचा नंबर लागायचा. तिथे वाट अडवून उभा असलेला कार्यकर्ता एकदम दहाबारा लोकांना देवळात प्रवेश द्यायचा. सगळ्यांचा एकदम गोंधळ होऊ नये म्हणून असे टप्प्या टप्प्या ने छोट्या ग्रुप ना आत सोडायचे काम तो करायचा. कुठलीही गोष्ट सहज सरळ साध्य झाली तर त्याचे आपल्याला महत्व वाटत नाही नै. त्यामुळेच पहाटे लवकर उठून ,आवरून, चालत येऊन रांगेत बराच वेळ ताटकळत उभे राहून एवढी वाट पाहून मग मंदिरात प्रवेश मिळाला की एक आत्मिक समाधान मिळायचे.  
     देवीचे देऊळ तसे छोटे आहे. कोयना नदीकाठी ब्रिटिश कालीन जुन्या पुलाच्या बाजूला निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे देऊळ. मंदिराच्या अगदी गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन सर्वांना घेता येते. गाभाऱ्याचे प्रवेशद्वार अगदी छोटे आहे. खाली वाकूनच गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो. आपला सगळा अहंकार,गर्व बाहेर सोडून नतमस्तक होण्याचाच तो क्षण. नाही वाकलो तर डोकं प्रवेशद्वारावर जोरात आपटणारच हे निश्चित.  कोयनेकडे मुख असलेली ही देवीची मूर्ती पूर्वेला स्थापन केली आहे. डाव्याबाजूला थोडीशी तिरकी झुकलेली मान असलेली आणि संगमरवरात रेखीव कोरलेली ही मूर्ती अत्यंत लोभस अशी आहे. असे म्हणतात की कृष्णाबाई आणि दैत्यनिवारणी नदीपात्राकडे पाहत असतात त्यामुळे त्यांची मान थोडी तिरकी झुकलेली आहे. नुसत्या तिच्या दर्शनानेच आपल्या मनावरचा सगळा भार हलका होऊन चित्त शांत होते.  गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊन सर्वांचं तिला हळदीकुंकू वाहून ओट्या भरणं, साडी नेसवणे चालू असे. सोबत आणलेले हार ,फुलं आपट्याची पानं वाहून कडकण्यांच्या माळांचा ही नैवेद्य दाखवला जाई. देवळात माळा बांधल्या जात. तिच्या पायाशी नतमस्तक होऊन दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालून आम्ही मंदिरात थोडावेळ बसत असू. देवीच्या दर्शनाने मन एकदम शांत प्रसन्न होई.

दैत्यनिवारणी ची एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी...

कराडची ग्रामदेवता म्हणून दैत्यनिवारणीचा उल्लेख होतो भगवान विष्णूच्या सांगण्यावरून गरुडाने अमृतकुंभ आणण्यासाठी पृथ्वीवर भ्रमण केले विश्रंतीसाठी तो कराड क्षेत्रावर थांबला असताना दैत्यांनी त्याच्यावर हल्ला केला त्यावेळी गरुडाने सुटका करून घेतली मात्र अमृत कलशातील काही थेंब पडले त्या क्षेत्राला आजही गरुडतीर्थ म्हणून संबोधले जाते

आसुरांचा संहार करण्यासाठी महाकाली  महालक्ष्मी ,महासरस्वती यांचे एकत्रित रूप देवांनी पृथ्वीवर पाठवले त्यांनी  आसुरांचा संहार केला . विश्रंतीसाठी त्यांना  देवांनी कराड क्षेत्रावर बोट दाखवले तेव्हापासून ही शक्तीदेवता दैत्यनिवारणी म्हुणुन कराडला वास्तव्यास राहिली .. अशी आख्यायिका सांगितली जाते. (ही माहिती गूगल वरून घेतली आहे.)

    थोडावेळ मंदिरात बसून मग आम्ही कोयनामाईकडे जायचो. तिथे आई आणि तिच्या मैत्रिणी नदीची पूजा करून द्रोणांमध्ये तुपाचे दिवे वाहत्या पाण्यात सोडत असत. पहाटेच्या निळया प्रकाशात ते दिवे कोयनेवर तरंगत प्रवाहित होताना आम्ही बराच वेळ ते दिसेनासे होईपर्यंत पहात राहायचो. असे वाटे जणु ब्रह्माण्डातले ग्रह तारे च पृथ्वीवर आवतीर्ण होऊन कोयनेत विहार करत आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानी, शांततेचे प्रसन्न भाव तरळत असायचे. 
     असे असीम आनंदाचे क्षण आम्ही स्मरणात कायमचे साठवून आहोत. त्यावेळी त्या क्षणांचं फारसं महत्व वाटलंही नसेल कदाचित आम्हाला पण आज ते आठवले की आमचं आयुष्य त्या अमूल्य क्षणांनी किती समृद्ध केलंय, श्रीमंत केलंय ह्याची जाणीव मात्र नक्की होते. 
     कोयनामाईला नमस्कार करून सूर्य उगवायच्या वेळी आम्ही सगळे घराकडे परतायला लागत असू. वाटेत लागणाऱ्या दोन तीन मंडळांच्या देवींचे ही दर्शन घेऊन मग घरी परतत असू. नवरात्र बसल्यापासून ते दसऱ्यापर्यंत नऊदहा दिवस रोज आमची अशी दर्शनयात्रा असे. उत्साह आणि नवचैतन्य घेऊन येणारा असा हा आपला सण. दसऱ्यादिवशी देवीला आपट्याची पानं वाहून सगळ्यांना वाटून वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करण्याची आपली प्रथा. "सोनं घे सोन्यासारखी रहा" असा डोक्यावर हात ठेवून  मोठ्यांनी दिलेला आशीर्वाद खऱ्या सोन्यापेक्षाही मौल्यवान वाटायचा. 
     नवरात्र बसल्यापासून रोज संध्याकाळी दसऱ्या पर्यंत कॉलनीमधे प्रत्येकाच्या घरी एकेक दिवस हादगा ही चाले. पाटावर हत्ती चं चित्र काढून त्याची पूजा करून आम्ही सगळ्या जणी  फेर धरून हादग्याची गाणी म्हणायचो. लहनमोठे सगळ्यांचा समावेश त्यात असायचा. शेवटी प्रत्येकीने करून आणलेली खिरापत ओळखायचा कस  लागायचा. त्यानिमित्ताने घरोघरी वेगवेगळे त्यातूनही लगेचच ओळखू न येणारे पदार्थ बनवण्याची जणू स्पर्धाच लागायची. प्रत्येकीची खिरापत ओळखून झाल्यावर तिथेच अंगणात बसून सगळ्यांना वाटून ती एकत्र बसूनच आम्ही खायचो. त्या सहभोजनाची गोडीच काही और होती. 
     देवीला कडकण्यांच्या नैवेद्याची प्रथा आमच्यात नसल्याने क्वचितच कधीतरी त्या आमच्या घरी केल्या जायच्या. पण देवीला नैवेद्य दाखवून झाला की दसऱ्याला हमखास सर्व शेजाऱ्यांच्यातून कडकण्या घालून ताटं आमच्यात यायची. पदार्थ एकच असला तरी प्रत्येकाची बनवण्याची पद्धत मात्र निरनिराळी असायची त्यामुळे चवीतही नावीन्य असायचे. प्रत्येकीच्या हातची चव वेगळी लागायची. कोणी रवा मैदा साखरेचा वापर करत तर कोणी अगदी पारंपारीक पद्धतीने कणिक आणि गूळ वापरून करत तर कोणी मैदा बेसनपीठ आणि साखर वापरून बनवत असत. सर्वच पध्दतीने केलेल्या कडकण्या आमच्या अगदी आवडीच्या आणि फस्त ही व्हायला वेळ नाही लागायचा. नवरात्रोत्सवाची सांगता व्हायची ती सोन्याची देवाणघेवाण करून आणि कडकण्या खाऊनच.
अशा सणावारी माझे मन माहेरच्या गोड आठवणींमध्ये एकदातरी फेरफटका मारून येतेच.
त्यातल्याच एक पारंपरिक पद्धतीच्या कडकण्या करण्याचा ह्यावेळचा माझा प्रयत्न.


कडकणी 

साहित्य:- 
१ वाटी गव्हाचे पीठ
१/४ वाटी गूळ
१ चमचा मीठ
पीठ मळण्यासाठी पाणी.
तळणीसाठी तेल 
कृती:-
*प्रथम गूळ पाण्यात विरघळवून घेऊन ते पाणी गाळून घेणे. म्हणजे गुळामध्ये काही कचरा असल्यास तो गाळून वेगळा होतो.
*पीठ अगदी घट्ट मळले जाईल एवढेच पाणी गुळात घालावे .
* त्या पाण्यात चमचाभर मीठ घालून गव्हाचे पीठ घालून घट्ट मळून घेणे.
* तो गोळा थोडेसे तेल लावून अर्धा तास मुरू दयावा. 
*एका कढईत तेल तापत ठेवावे.
*मुरलेल्या पिठाच्या छोट्या छोट्या लाट्या करून अगदी पातळ लाटून त्यावर काटेरी चमच्याने टोचावे. असे केल्याने कडकणी पुरीसारखी फुगत नाही.
* गरम तेलात मंद आचेवर कडकण्या तळून घ्याव्यात. 
*गार करून हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. 
*तशा टिकू शकतात बरेच दिवस पण जर लगेच फस्त नाही झाल्या तरच. 😊

बोला ।। दैत्यनिवारणीचा उदो उदो।।🙏🌺😇

।।सोनं घ्या सोन्यासारखे रहा।। 😊

© सौ.श्वेता अनुप साठये
८/१०/२०१९

दैत्यनिवारणीचा फोटो गुगलच्या सौजन्याने.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा