गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

नरसिंहपूर, बहे, वाडी,खिद्रापूर

सध्या यात्रेचे योग आहेत. आईची आणि माझी अचानक घडलेली ही अजून एक छोटीशी यात्रा. पहाटे लवकर निघालो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण अल्हाददायक होतं.  सगळीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी निसर्गाचा  हिरवगार गालिचा तयार झालाय. उगवतीच्या सूर्याची किरणं कृष्णा कोयनेच्या पाण्यावर हिऱ्यासारखी चमचमत होती.  गाई गुरांचा रवंथ करतानाचा येणारा एक विशिष्ट वास, वासरांचं हंबरणं, पक्षांचा किलबिलाट , मधूनच  येणारा चुलीचा वास...अहाहा!! दिवसाची सुरवात अशी एकदम प्रसन्नतेने झाली.

नरसिंहपुर...
     सुरवात नरसिंहपूर पासून केली. मंदिर परिसरात पोहचताच पारिजातकाच्या फुलांचा स्वर्गीय सुगंध दरवळला. नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे ओली झालेली जमीन, तिच्या मातीचा गंध  त्यावर सडा पडलेली चांदण्यांसारखी  केशरी देठाची ती नाजूक फुलं. दोन्हींच्या संमिश्र अशा सात्विक,दैवी सुगंधाने परिसर भरून गेलेला.
     नरसिंह मंदिरात सकाळची आरती मिळाली.  अखंड शाळिग्रामात कोरलेली पुरातन मूर्ती अप्रतिम आहे. गर्दी नव्हती ,अगदी चारच जण आरतीला होतो त्यामुळे खूप छान दर्शन झाले. आरती, घंटानाद झाल्यावर तिथेच बसून ध्यान करता आले. गुरुजींनी दिलेला तीर्थ प्रसाद घेऊन कृष्णा नदीकाठी असलेल्या महादेव मंदिराकडे गेलो. मंदिर छोटंसं पण एकदम देखणं ,सुंदर रंगवलेलं आहे. त्याच्या मागून वाहती कृष्णा नदी . कृष्णेच्या संथ वाहणाऱ्या प्रवाहकडे पाहत राहणे हा निखळ आनंद. एकदम meditative. थोडा वेळ परिसर फिरून पुढे औदुंबर ला निघालो.

औदुंबर, भिलवडी...
     औदुंबर ला पोहचता पोहचता पाऊस लागला. पायऱ्या उतरून खाली आईला घेऊन जाणं थोडं धोक्याचं वाटत होतं...दगडी पायऱ्या चिखल, शेवाळ्या मुळे  खूपच निसरड्या झाल्या होत्या ...त्यामुळे पडायची भीती वाटत होती...ह्या वयात तिच्यासाठी जरा हे जिकिरीचं होतं...पण आईची इच्छाशक्ती दांडगी आहे... एखादी गोष्ट करायची  तिने मनाने ठरवली की काहीही करून ती ती पार पाडतेच.... नेहमीच प्रेरणा मिळते तिच्याकडून मला. हळूहळू एकेक करत पायरी उतरून ती देवळात पोहचली. दत्तगुरुंची च कृपा... तिथे दर्शन घेऊन क्षणभर विसावलो. समोर नदी पलिकडे एक सुंदर मंदिर दिसले. खरंतर बऱ्याचदा औदुंबर ला जाणं होऊन त्या मंदिरात जायचा कधी योग आला नव्हता की तिकडे फारसं लक्ष ही गेलं नव्हतं. योग असतात एकेक... भावाने हट्टाने सांगितले काहीही झालं तरी त्या मंदिराला भेट द्याच म्हणून. तिथून निघालो ते त्या भिलवडीत असलेल्या मंदिराकडे. 
     पंधरा मिनीटात पोहचलो ...बाहेरून मोठी दगडी compound भिंत आहे...वळसा घालून गेलो आणि समोर भव्य असं स्वच्छ, सुंदर, रंगवलेले पुरातन मंदिराचे प्रथम दर्शन. एकदम ऐसपैस आणि शांत आवार...श्री देवी भुवनेश्वरी चे हे मंदिर.  संपूर्ण दगडी बांधकाम आहे मंदिराचे. दगडी खांब, कोरीवकाम आहे. कळसावर देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. 
     गर्दी नव्हतीच. त्यामुळे अगदी गर्भगृहा पर्यंत जाऊन गुरुजींनी दर्शन घ्यायला सांगितले.  देवीची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली, एका हाता मध्ये शंख तर दुसऱ्या हातात चक्र धारण केलेली अत्यंत विलोभनीय अशी आहे. पूजा साधारण कोल्हापूरच्या आंबाबाई सारखी आहे. 
     त्याच परिसरात महादेव, विठ्ठल रुक्मिणी, गणपती अशी ही मंदिरे आहेत. समोरच काळभैरवाचे ही छोटेसे मंदिर आहे.  दीपमाळ आहे. भक्तांची साद ऐकायला कृष्णेच्या एका तटावर श्रीदत्तप्रभु तर दुसऱ्या तटावर श्री भुवनेश्वरी विराजमान. अवश्य भेट द्यावी असे हे स्थान.

रामलिंग बहे...
      भिलवडी चे भुवनेश्वरी देवीचे मंदिर पाहून नरसोबाच्या वाडीला जायला निघालो. आमचे ड्रायव्हर,कृष्णा म्हणाले काकू चालू शकत असतील तीन चार किलोमीटर तर रामलिंग बहे पाहायला जाऊ. देवाला जायला आईची कधीच ना नसते...काहीही झालं तरी चालेनच म्हणाली, पण एवढं म्हणतायत ते, योग आलाय चांगला तर जाऊनच येऊ. प्रबळ इच्छाशक्ती.
     रामलिंग मंदिर कृष्णानदी मधे एका बेटावर आहे. नदीवरच्या बांधाच्या भिंतीवरून पायी जावे लागते...तीच वाट पुढे मंदिरापर्यंत जोडली आहे.  आम्ही नदीकाठी पार्किंग area मध्ये कार पार्क करून निघालो.
      तेवढ्यात अचानक एक कुत्र्याचं गोंडस पिल्लू कुठूनतरी पळत येऊन अगदी माझ्याशी जुनी ओळख असल्यासारखे माझ्या अंगावर उड्या मारून पाय चाटू लागलं. एकदम उचलून घ्यावं असं वाटलं. भुक्याजलेलं दिसत होतं. पण त्याला खायला देण्यासारखे जवळ काहीच नव्हते. आजुबाजूला पाहिलं खरं दुकानं ही नव्हती. दोन पाच मिनिट थांबून आम्ही शेवटी नाईलाजाने पुढे चालायला लागलो. ते पिल्लुही आमच्यासोबत च चालत निघाले. 
     नदीच्या बांधावरून चालताना बरेच पक्षी दिसले. बदकं , बगळे, खंड्या,  सुगरणी, ग्रीन bee eater, stork, भारद्वाज,मैना, sunbirds, कबुतरं, अजून बरेच. माकडं ही भरपूर होती वाटेत. मला आमची शृंगेरी ची ट्रीप आठवली त्यामुळे जरा जपूनच निघाले. पण ह्या माकडांनी काही त्रास नाही दिला. कुत्र्याचे ते पिल्लु ही सोबतच होतं. भरपूर झाडी, दोन्ही बाजूंनी खडकांमधून  वाहणारी नदी आणि आम्हीच तिघे वाट चालत मंदिराजवळ पोहचलो. बाकी माणसं कोणीच नव्हती आजुबाजूला. मजबूत भिंत, दगडी पायऱ्या, वडा पिंपळाचे मोठाले वृक्ष, बराच मोठा आवार आहे. पायऱ्या चढून वर गेलो, दगडी बांधकाम असलेलं सुंदर मंदिर दिसले. काळ्या पाषाणात कोरलेला मोठा नंदी आहे. महादेवाची पिंडी त्यामागे राम लक्ष्मण सीतेच्या सुबक मूर्ती असं मुख्य मंदिर आहे. त्याच मंदिराच्या मागच्या बाजूला हनुमान , गणपती अशीही बाकीची मंदिरे आहेत. बाजूने खळाळत वाहणारी नदी, एकदम शांत परिसर खूप आवडला. 
     थोडावेळ तिथे उभे राहून परिसर, पक्षी, नदी पाहत उभ्या होतो दोघी तर ते बिचारं कुत्र्याचं पिल्लु ही दमून विश्रांती घ्यायला अगदी आमच्या पायाजवळच येऊन झोपले. तिथेही त्याला काही खायला द्यायला मिळालं नाही त्यामुळं आम्हाला मनातून फार वाईट वाटायला लागले. 
     तिथून परत जायला निघालो तर परत पिल्लाची स्वारी आमच्या मागे. पार्किंग area मध्ये येऊन कार मध्ये बसणार एवढ्यात मला आठवलं एका डब्यात चारपाच बेसनाचे लाडू घेतले होते. त्यातला एक लाडू काढून आधी थोडासा त्या पिल्लाला भरवला. खातंय असं दिसल्यावर एकदोन लाडू त्याला भरवले. त्यानं ही अगदी मिटक्या मारत खाल्ले. कुठले काय ऋणानुबंध असतात आपल्या आकलना पलीकडचे आहे. त्याचा आमच्यासोबतच कार मधून येण्याचाच मानस होता😀....माझ्याही मनातून त्याला सोबत आणावं असंच वाटत होतं पण मनाला आवर घालून पण त्याला थोडंसं कुरवाळून त्याचा निरोप घेऊन पुढच्या वाडीच्या यात्रेला निघालो.

नरसोबाचीवाडी , खिद्रापूर, कोल्हापूर
    
     रामलिंग बहेहून निघालो  नरसोबाच्या वाडीला  पोहचे पर्यंत चांगलाच पाऊस लागला. मंदिराच्या वाटेवर दुकानांमध्ये ठेवलेल्या पेढे, खवा, बासुंदी, कवठाच्या बर्फीचा संमिश्र असा मस्त खमंग वास आला. नरसोबा वाडीची खासियत. बाळ लोकरीची कांबळी, घोंगडी बाजारात दिसू लागली. मन एकदम बालपणात झेपावलं. त्या बाळ लोकरीच्या जेन ची सर आत्ताच्या लाखाच्या घरातल्या सोफ्यांना ही नाहीच. थंडीत ऊब देणारी आणि गरमी मध्ये थंडावा, म्हटलं तर सोफा, बैठक, तर घटकेत अंथरूण. त्यात पुन्हा हळदीकुंकवा सारखे छोटे मोठे समारंभ असोत किंवा आम्ही मांडलेले भातुकलीचे, कॅरम चे खेळ असोत, माहेरची मायेची ऊब ठासून भरलेलं असं सगळ्यांना सामावून घेणारं  जादुई जेन.
    पाऊस कमी झाल्यावर दर्शनाला गेलो. पाण्याच्या मोठ्या पाईप ने मंदिर परिसर धुवून काढायचं काम चालू होतं. सूचक होतं... आपल्या मनातली ही क्लिमिषं, संदेह, काळज्या, चिंता धुवून काढून दत्तप्रभुंच्या चरणांशी नतमस्तक व्हा. प्रदक्षिणा मार्गावर पूजेच्या अभिषेका च्या घागरी लख्ख धुवून ठेवल्या होत्या. दर्शनाने आमची मनं ही तशीच झाली. 
    श्री दत्त प्रभूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे १२ वर्षे वास्तव्य करून तपश्चर्या केली. १३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंह स्वामींचा जन्म झाला. १३८८ मध्ये संन्यास दीक्षा घेऊन ते तिर्थटनाला निघाले. १४२२ ला औदुंबर क्षेत्री त्यांनी मुक्काम केला. कृष्णा पंचगंगा किनारी १२ वर्षे तपश्चर्या करून तेथे पवित्र संगमस्थळी औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवी ची स्थापना केली. आणि आपण येथे वास करू अशी भक्तांना ग्वाही देऊन गाणगापुरी प्रस्थान केले. तेच हे नृसिंहवाडी/नृसिंह वाटिका/नरसोबाची वाडी क्षेत्र. 

(माहिती गूगल वरून साभार.)

खिद्रापूर ...
     पुढे वाडीहून खिद्रापूर ला आलो. तेथे कोपेश्वर आणि जैन मंदिर प्रसिध्द आहेत. महादेवाचे हे प्राचीन मंदिर शिलाहार  शिल्प स्थापत्य शैलीचे आहे. येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूनी केले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून १२ किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.

   मंदिराची फार पडझड झाली आहे. एक खुला मंडप ,आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा तलविन्यास आहे. बऱ्याच भग्न केलेल्या मूर्ती दिसून येतात. वाईट वाटते फार असे पाहून. जवळच जैन मंदिर आहे. त्याचीही शिल्पकला फार सुंदर, पाहण्यासारखी आहे. सुस्थितीत आहे ते मंदिर. 

     तिथून थेट आम्ही कोल्हापूर ला गेलो. खूप गर्दी असूनही शांत निवांत दर्शन घेता आले. कुठेही गडबड गोंधळ न होता. फार प्रसन्न वाटले. मंदिर परिसरातील बाकीच्या मंदिरांचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करून परतीच्या प्रवासाला आम्ही दोघी जायला निघालो, आईची एक बालपणीची मैत्रीण अचानक देवळात भेटली... आणि तेवढ्यात पुन्हा एकदा ढग दाटून आभाळ भरून आले... आणि आमची मनंही.

सौ. श्वेता अनुप साठये✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा